Breaking

गुरुवार, १ जुलै, २०२१

"पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बुधवारी निवृत्त"



     जेष्ठ नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने हे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बुधवारी निवृत्त झाले. आपल्या ३६ वर्षांच्या सेवेत त्यांनी एकुण १ लाख ६२ हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. बीडसारख्या एका ग्रामीण भागातून डॉक्टरकी सुरू केलेल्या तात्याराव लहाने यांनी जे जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे सहसंचालक अशी महत्वपुर्ण पदे सांभाळली. आतापर्यंत त्यांना महात्मा फुले पुरस्कार, राजर्षी शाहू पुरस्कार, आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी गौरविले आहे. त्याचबरोबर आयूष टास्क फोर्स, पेडीयाट्रीक टास्क फोर्सचे सदस्य म्हणून कोविड उपचारांच्या मार्गदर्शक सूचना सर्वांपर्यंत पोहचण्याचे काम केले.

     अधिष्ठाता किंवा सहसंचालक असतानांही अंधत्व निवारण करण्याचे काम हे अविरतपणे सुरु ठेवले आहे. निवृत्तीनंतरही नेत्र विभागात गरीब रूग्णांवर डोळ्यांवरील शस्त्रक्रिया करणार असल्याचे तात्याराव लहाने यांनी सांगितले.


डॉ. तात्याराव लहाने यांनी निवृत्तीची माहिती दिली आहे. तसेच डॉ.लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आहे. यामध्ये डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलंय की, मित्रहो आज मी ३६ वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. १७ मे १९८५ रोजी मी अधिव्याखाता म्हणुन अंबाजोगाई जि. बीड येथे सेवेत रूजु झालो होतो. अंबाजोगाई येथे असतानाच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मी नेत्रशिबीरांना सुरूवात केली होती. बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांत जाऊन अंधत्व़ आलेल्यांना दृष्टी देण्याचे काम आठ वर्ष केले. त्यानंतर धुळे येथील नवीनच स्थापीत झालेल्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात आक्टोबर १९९३ ते जुलै १९९४ असे नऊ महिने काम केले. तेथेही आदिवासी व दुर्गम भागांत जाऊन नेत्रशस्त्रक्रिया केल्या. पण किडनीच्या आजार बळावल्याने मी मुंबई येथे सर जेजे रूगणालयात जुलै १९९४ ला रूजु झालो. दर गुरूवारी माझे डायलिसीस सुरू झाले.


मी येथे आल्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेण्यास सुरूवात केली. पुढे माझा किडनीचा आजार बळावला. किडनी बदलावी लागणार होती. माझी आई (माय) अंजनाबाईने स्वत:ची किडनी देऊन फेब्रुवारी १९९५ ला मला दुसरा जन्म दिला. मायीच्या या दातृत्वाने प्रेरीत होऊन मी सामाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात माझी पत्नी सौ. सुलोचना तात्याराव लहाने तसेच माझ्या मुली ॲड. सपना सावंत (लहाने) व डॉ. सौ. सायली वाघमारे व माझा मुलगा डॉ. सुमित लहाने यांचा सदोदीत पाठींबा राहीला. सुट्टीच्या दिवशी ग्रामीण भागांत जाऊन शिबीरे घेण्यास सुरूवात केली. डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनात येण्याचे निमंत्रण दिले. तेथे श्रध्देय बाबांची भेट झाली. बाबांचे आशिर्वाद व प्रेरणा मिळाल्यानंतर या कामाला खरी गती आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन अंधत्व निर्मुलनाचे काम केले.डॉ. रागिनी पारेख , कै. मारुती शेलार व ६७ लोकांची टीम माझ्याबोरबर सहभागी झाली.


प्रत्येक सुट्टी आमच्यासाठी पर्वणी असे. आदिवासी व ग्रामीण भागांत जाऊन आम्ही शस्त्रक्रिया केल्या. आजपर्यंत जे.जे. रुग्णालयातील चमू बरोबर महाराष्ट्रातील आदिवासी व ग्रामिण भागामध्ये जाऊन शस्त्रक्रियेची शिबीरे घेऊन अंधत्व निवारण करण्याचे काम गेली 25 वर्षे अविरतपणे केले. आजपर्यंत 667 शिबीरांमधून 30 लाखांच्यावर रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच 20 लाख रुग्णांवर सर ज.जी. रुग्णालयात उपचार केले असून आजपर्यंत 50 लाख रुग्णांवर तपासणी व उपचार करण्यात आले. त्याचबरोबर 180 पेक्षा जास्त शिबीरमध्ये शस्त्रक्रिया करुन 1 लाख 30 हजार रुग्णांना दृष्टी परत मिळवून देण्याचे काम केले. तसेच जे.जे. रुग्णालयामधील रिजनल इन्स्टीटयूट ऑफ ऑफथॅलमोजॉजी येथे होणाऱ्या शस्त्रक्रीयांमध्ये 600 पासून ते 19 हजार प्रति वर्ष एवढया मोठया प्रमाणात गरीब व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रीया करण्यात आल्या.


सर ज.जी. समूह रुग्णालयात या कालावधीत 4 लाख नेत्र शस्त्रक्रीया करण्यात आल्या त्यापैकी 1 लाख 62 हजार शस्त्रक्रीया मी स्वत: केल्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध भागात शस्त्रक्रीयेनंतर‍ निर्माण झालेला गुंता व त्यामूळे आलेले अंधत्व त्यावर शस्त्रक्रीया करुन रुग्णांना दृष्टी परत मिळवून देण्याचे काम केले. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून जे.जे. रुग्णालयाचा सर्वांगिण विकास करणे तसेच जे.जे. रुग्णालयामध्ये येणाऱ्या 5 लाख रुग्णसंख्येत वाढ करुन ती 10 लाखापर्यंत वाढविण्यात आली. त्याचबरोबर 16 हजार शस्त्रक्रीयांमध्ये वाढ करुन त्या 42 हजार प्रति वर्ष करण्यात यश मिळवले. जे.जे. रुग्णालयामध्ये कार्यालयीन इमारत, गरजू रुग्णांसाठी धर्मशाळा बांधण्यात आले. तसेच पी.जी. च्या 97 जागांमध्ये वाढ करुन 175 जागा निर्माण करण्यात आल्या. सुपर स्पेशालीटी रुग्णालय असावे याकरीता 1100 खाटांचे सूपर स्पेशालिटी रुग्णालय मंजूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले व त्याचे काम जोमाने सुरु झाले आहे. ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतातील सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून 5 व्या क्रमांकावर येण्याचा मान मिळाला आहे. मला आजपर्यंत मानाच्या पद्मश्री पुरस्कारासह 500 च्या वर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.


सहसंचालक या पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर परिचर्यां संवर्गाची भरती, वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली. संचालक म्हणून बारामती, नंदूरबार येथे महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचप्रमाणे सातारा, अलिबाग व सिंधुदूर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. कोवीड-19 च्या प्रादूर्भाव उद्भवल्यानंतर कोवीड 19 चे नोडल अधिकारी म्हणून मनुष्यबळासाठी आवश्यक असणारे डॉक्टर्स त्यामध्ये खाजगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स, रेसीडेंट डॉक्टर्स, बंधपत्रीत डॉक्टर्स यांना आदेश देऊन त्यांची नियूक्ती आवश्यकतेनुसार ग्रामिण व शहरी भागामध्ये करण्यात आली. तसेच आवश्यक त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची प्रतिनियूक्ती करण्यात आली.


      त्याचबरोबर कोवीड महामारीच्या सुरुवातीला फक्त 3 प्रयोगशाळा कार्यरत होत्या त्यामध्ये वाढ करुन एकूण 254(शासकीय-130 व खाजगी-124) प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करुन त्याचे निकष ठरविण्यासाठी व्ही.सी द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. 20 महाविद्यालयांमध्ये कोवीडसाठी वेगळे कक्ष स्थापन करण्यात आले. ऑक्सीजन कॅपॅसीटी, आयसीयू कॅपॅसीटी यामध्ये लक्षणीय वाढ करुन रुग्णांचा मृत्यू दर 2 पर्यंत कमी करण्यासाठी रोज व्ही.सी. द्वारे तज्ञांचे मार्गदर्शन देऊन प्रत्येक रुग्णांचा पाठपूरावा करुन मृत्यू दर कमी करण्यात आला. त्याचबरोबर आयूष टास्क फोर्स, पेडीयाट्रीक टास्क फोर्सचे सदस्य म्हणून कोविड उपचारांच्या मार्गदर्शक सूचना सर्वांपर्यंत पोहचण्याचे काम केले.

          अधिष्ठाता किंवा सहसंचालक असतानांही अंधत्व निवारण करण्याचे काम हे अविरतपणे सुरु ठेवण्यात आले. मी संचालक या पदावरुन आज निवृत्त होत आहे, परंतू पूढील काळात माझे अंधत्व नियंत्रणाचे व नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रीयेचे काम हे नेहमीसाठी सुरु राहील. या 36 वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो मित्र मिळाले, अनेक लोकांची मदत झाली त्यासर्वांचा नामाउल्लेख करणे शक्य नाही पण त्या सर्वांचा ऋणी आहे. त्या सर्वांचे प्रेम मिळणारा मी एक अतिशय नशिबवान डॉक्टर स्वत:ला समजतो. हे आपले प्रेम कायम ठेवावे अशी आपल्याकडे प्रार्थना करतो. असे डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा