Breaking

बुधवार, १९ मे, २०२१

आता RTPCR साठी नाका-तोंडातील स्वॅब घेण्याची गरज नाही

 



      आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीसाठी नाक आणि तोंडातील स्वॅब घेतला जातो. चाचणी करवून घेणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया त्रासदायक असते. तसेच या चाचणीनंतर अचानक शिंका येतात व चाचणी करवून घेणारा करोना बाधित असल्यास आसपास उपस्थित असलेल्यांचा धोका वाढतो. मात्र, आता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) यावर उपाय शोधला आहे. सलाइन पाण्याने गुळणी केल्यास व हेच पाणी सॅम्पल म्हणून संकलित केल्यास त्याद्वारे चाचणी केली जाऊ शकते. यात रुग्णांना होणारा त्रास कमी होणार असून पैशांची व मनुष्यबळाचीही बचत होणार आहे.


      नीरीच्या व्हायरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. क्रिष्णा खैरनार याबाबत म्हणाले, ‘नीरीने सलाइन गार्गल आरटीपीसीआर टेस्ट हे तंत्र विकसित केले आहे. यामुळे आता नाका-तोंडातून स्वॅब संकलित करण्याची गरज नाही. चाचणी करणाऱ्या व्यक्तीला सलाइन पाणी दिले जाईल. या व्यक्तीने १५ सेकंदांसाठी संपूर्ण घशातून गुळणी (गार्गल) करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील १५ सेकंद चूळ (पाणी तोंडात ठेवणे) भरणे अपेक्षित आहे. त्यानंतर हे पाणी त्या व्यक्तीने एका ‘व्हेसल’मध्ये थुंकावे. हेच पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाईल. संबंधित व्यक्ती करोना बाधित असल्यास त्याच्या तोंडातील विषाणू या पाण्यात संकलित होतो आणि ही चाचणी शंभर टक्के शास्त्रीय दृष्टीकोनातून पार पडते.'


आता कमी खर्चात होणार चाचणी


     या स्पॅम्पलचे ‘आरएनएन एक्सट्रॅक्शन’ही करण्याची आता गरज नाही. त्यासाठीसुद्धा नीरीने एक विशिष्ट द्रव्य तयार केले आहे. या द्रव्याच्या आधारे फारच कमी वेळात तपासणी पूर्ण होते. यामुळे ‘आरएनएन एक्सट्रॅक्शन कीट’ची गरज नसून आता मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होणार आहे. एकूणच या तंत्रामुळे स्वॅब घेण्यासाठी लागणारा वेळ व त्यासाठी खर्ची पडणारे मनुष्यबळही वाचणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेसुद्धा नीरीच्या या तंत्राला मान्यता दिली आहे. परिषदेने नीरीला देशातील इतर महत्त्वाच्या प्रयोगशाळांनासुद्धा या तंत्राचे प्रात्याक्षिक देण्याच्या सूचना केल्या आहेत, असे खैरनार यांनी सांगितले. त्यामुळे हे तंत्र आता लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ शकते अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा