दिल्ली : आजच्या हायटेक जमान्यात इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. काम कोणतेही असो, इंटरनेट नसेल तर अडचणी येणारच, अशी आजची परिस्थिती आहे. भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशात तर इंटरनेटचा वापर खूपच वाढला आहे. सन २०२५ पर्यंत भारतात तब्बल ९० कोटी इंटरनेट युजर्स असतील, असा अंदाज आहे. आता इतक्या मोठ्या संख्येने लोक इंटरनेट वापरत आहेत. टेक्नोसॅव्ही होत आहेत, म्हटल्यावर सायबर सुरक्षेच्या महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. इंटरनेटचा वापर करताय म्हटल्यानंतर सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. या क्षेत्रात भारताने काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाच्या बाबतीत कायमच दादागिरी करणाऱ्या चीनला सुद्धा भारताने पछाडले आहे.
होय, सायबर सिक्योरिटी इंडेक्सचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात भारताने २०२० मध्ये ग्लोबल सायबर सिक्योरिटी इंडेक्स मध्ये मोठी झेप घेत दहावा क्रमांक मिळवला आहे. युनायटेड नेशन्सच्या या अहवालानुसार ग्लोबल सिक्योरिटी इंडेक्समध्ये भारताने दहावा क्रमांक पटकावला आहे. या यादीत भारताने चीन आणि पाकिस्तान या देशांवर मात केली आहे. या यादीत चीन ३३ तर पाकिस्तान ७९ व्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या तर युके दुसऱ्या क्रमांकावर आहे. साऊदी अरेबिया तिसऱ्या तसेच सिंगापूर आणि स्पेन संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहेत. रशिया, युएई आणि मलेशिया या देशांना संयुक्तपणे पाचवा क्रमांक मिळाला आहे. कॅनडा, जपान, फ्रान्स हे देशच फक्त भारताच्या पुढे आहेत.
भारताने सायबर सुरक्षेत केलेल्या या कामगिरीचे संयुक्त राष्ट्रसंघाने कौतुक केले आहे. भारताने केलेली ही कामगिरी म्हणजे सायबर सुरक्षेत यश आणि दृढनिश्चय दर्शवत आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. सीजीआयच्या या अहवालात सुद्धा म्हटले आहे, की सायबर सुरक्षेबाबत भारताने जगभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सायबर सिक्योरिटी रँकिंग निश्चित करताना कायदेशीर उपाय, तांत्रिक उपाय, संघटनात्मक उपाय, विकास क्षमता आणि सहयोगात्मक उपाय या घटकांचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले.
👍🙏🏻👌👌💐🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तर द्याहटवा