मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. यावेळी सभागृहात विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. एवढंच नाहीतर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे भाजपचे डझनभर आमदार निलंबित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
यावेळी भाजपाचे पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा