मुंबई: जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले असून बहुमताच्या आधारे हे सरकार काम करत आहे. मात्र, कधी याला तुरुंगात टाकतो तर कधी त्याला तुरुंगात टाकू, अशा धमक्या द्यायच्या आणि आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, दमबाजी व मारामारी करण्याचे काम भाजप करत आहे. हे लोकशाहीला घातक असून ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप सदस्यांनी विधानसभेत गोंधळ घालत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारवाईचे पाऊल उचलत भाजपच्या १२ सदस्यांवर एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे राजकारण तापलं असतानाच राष्ट्रवादीच्या वतीने नवाब मलिक यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना याआधी कधीही घडली नाही आणि या साऱ्या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या सर्वांचे नेतृत्व करत होते ही दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दांत मलिक यांनी निशाणा साधला. विधानसभेत ओबीसी आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने केंद्राकडून इम्पिरिकल डाटा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर विरोधी पक्षाने हरकत उपस्थित केली. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी विरोधी सदस्यांना बोलण्याची संधी दिली. त्यानंतर ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुद्देसूद जो घटनाक्रम होता त्याची माहिती दिली. त्यावेळी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मतास टाकल्यानंतर भाजपचे बरेच आमदार पीठासीन अधिकाऱ्यांच्या टेबलकडे गेले. तेथील माइक उचलला, राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला आणि धक्काबुक्कीही केली. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा माइक आणि स्पीकर फोडला, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
This is how it all started. BJP leaders stormed into #Maharashtra #Assembly #Speakers #Chamber. During first day of Assembly session pic.twitter.com/Z2NjIjwckv
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 5, 2021
अध्यक्षांच्या चेंबरमध्ये अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्याजवळ जाऊन भाजपच्या सगळ्या आमदारांनी त्यांना घेरलं. धक्काबुक्की केली, आईबहिणीवरुन शिवीगाळही केली. अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडली नव्हती, असे नमूद करताना भाजपला आता गुंडगिरी करून विधानसभेचे कामकाज थांबवायचे असेल तर ते महाविकास आघाडी सरकार कधीही खपवून घेणार नाही, अशा स्पष्ट शब्दात नवाब मलिक यांनी भाजपला इशारा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा