कराड : आपण सर्वजण संपत्ती, अनैतिक संबंध आणि अशा विविध कारणावरुन खून केल्याची घटना दररोज कुठे ना कुठे घडत असतात. त्यातही आपल्या पोटच्या पोरांचा जीव घेण्याच्या घटना तशा दुर्मिळच असतात.
अशीच एक घटना बुधवारी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड शहरात घडली. आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करून मातेने स्वत: विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
कऱ्हाड शहरातील रूक्मिणीनगर मध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत मातेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनुष्का सुजित आवटे (वय ३६, रा. रूक्मिणीनगर, वाखाण रोड, कऱ्हाड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. तर हर्ष सुजीत आवटे (वय ८) व आदर्श सुजित आवटे (वय ६) अशी मृत मुलांची नावे आहेत.
घटनाक्रम :
मुल खेळायला बाहेर न आल्याने आजीने हाक मारली
कऱ्हाड शहरातील वाखान परिसरात राहणाऱ्या सुजीत आवटे यांचे चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. तेव्हापासून त्यांची पत्नी अनुष्का या नैराश्यात होत्या. सध्या रुक्मिणीनगरमध्ये वाखान रोड येथील घरात अनुष्का यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा हर्ष आणि लहान मुलगा आदर्श असे तिघेजण वास्तव्यास होते. त्यांचे घर तीन मजली असून दुसऱ्या मजल्यावर दिरासह इतर कुटूंबिय राहतात. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजले तरी हर्ष आणि आदर्श ही दोन्ही मुले खेळण्यासाठी आली नाहीत, त्यामुळे मुलांची आजी दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या नंबरच्या मजल्यावर गेली. आजीने मुलांना हाक मारली. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती मुले झोपत असलेल्या रूममध्ये गेली. तेथे मुले बेडवर निपचीत पडलेली होती. त्यांच्या अंगावर पांघरून होते. तर त्यांच्या बाजूलाच अनुष्काही निपचित पडल्या होत्या.
समोरील दृष्य पाहून सर्वांना धक्का
आजीने मुलांच्या अंगावरील पांघरुण बाजूला करून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुले जागची हलली नाहीत. त्यामुळे आजीला संशय आल्याने त्या मोठमोठ्याने ओरडत खोलीतून बाहेर पळाल्या. त्यानंतर इतर नातेवाईक आणि शेजारी त्वरित त्याठिकाणी धावले. समोरील दृष्य पाहून सर्वांना धक्काच बसला. हर्ष आणि आदर्श नातेवाईकांना मृतावस्थेत आढळून आले. तर अनुष्का यांची प्रकृती गंभीर होती. नातेवाईकांनी तातडीने त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही मुलांचा गळा दाबून मी स्वत: आत्महत्या करीत आहे, असे अनुष्का यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मुलांना वडिलांचे प्रेम मिळत नाही..!
अनुष्का या पती सुजीत यांच्या निधनाने एवढ्या दु:खी झाल्या होत्या की, प्रत्येक ठिकाणी त्यांना पतीची उणिव जाणवत होती. त्यांनी लिहीलेल्या चिठ्ठीतून ते स्पष्ट होत आहे. मुलांना वडिलांचे प्रेम मिळत नाही. त्यांच्याशिवाय जगण्यात काहीच अर्थ नाही. या घटनेला कोणालाच जबाबदार धरू नका. त्रास देऊ नका, असे अनुष्का यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. तसेच त्यांनी ही चिठ्ठी पोलिसांना उद्देशून लिहिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा