Breaking

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

*सांगली जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवा केंद्राच्या वतीने प्लॅस्टिकचे मोठ्या प्रमाणात संकलन*

 

सार्वजनिक ठिकाणावरील प्लॅस्टिक संकलन


*पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी प्लॅस्टिकमुक्त वातावरणाची गरज : प्राचार्य भास्कर  ताम्हणकर*


प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हनकर मार्गदर्शन करताना


*प्रा.डॉ.प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


सांगली :नेहरू युवा केंद्र व सांगली जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वच्छता अभियानांतर्गत प्लॅस्टिकचे प्रचंड प्रमाणात संकलन करण्यात आले.

     सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक शिक्षण संस्थेच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यांच्या पालकत्वाखाली सकाळी ८.३० ते दु.१२.३० या कालावधीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

     शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना   कक्षाचे संचालक मा. प्रा.अभय जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. पोपटराव माळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रारंभिक या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत करुन रासेयो सांगली जिल्हा समन्वयक प्रा.पोपटराव माळी प्रास्ताविकात  म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाचा देशपातळीवर मोठा गाजावाजा करीत अत्यंत वेगाने ही मोहीम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून प्लॅस्टिकमुक्त परिसर व वसुंधरा हरित शपथग्रहण या दोन कार्यक्रमाचं आयोजनाचा हेतू लोकांच्या मध्ये जनजागृती करणे होता.

विलिंग्डन महाविद्यालयाचे कार्यशील प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर म्हणाले की, सांगली, मिरज व  कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक मुक्तीसाठीचा जागर होणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी हे नेहमीच निकोप हेतूने व सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय कार्य करीत असतात अशावेळी प्लॅस्टिकमुक्त परिसर व ग्रीन सिटी असे रचनात्मक कार्यक्रम राबविणे गरजेचे असून शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यासाठी नेहमीच सज्ज असते. प्लॅस्टिक मुक्तीबाबत आपलं मत मांडताना ते म्हणाले, दैनंदिन व्यवहारात प्रत्येक घटक हा प्लॅस्टिकचा वापर करत असतो. देशाच्या चिंरतन विकासासाठी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे गरजेच आहे. त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन करून याची सवय लावणे खूप महत्त्वाचे आहे कारण पर्यावरण संतुलन टिकवायचा असेल तर प्लॅस्टिक मुक्त वातावरणाची निर्मिती होणे आवश्यक आहे यासाठी एन एस एस च्या माध्यमातून नैसर्गिक बांधिलकी जपत प्लॅस्टिक मुक्तीचा नारा दिला पाहिजे. कारण प्लॅस्टिकचे जैविकरित्या विघटन होत नाही त्याचा विपरीत परिणाम मनुष्य व प्राण्याच्या वर होण्याची शक्यता दाट असते यासाठी त्यांनी ज्वलंत दाखले दिले. सरतेशेवटी ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या प्रत्येक कार्यक्रमात प्लॅस्टिक बॉटलचा वापर न करता तांब्याच्या भांड्याचा वापर केला जातो त्याचे अनुकरण सर्व संलग्नित महाविद्यालयांनी करावे असा सल्लाही त्यांनी दिला. त्याचबरोबर आरोग्यदायी परिसर व  वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन हे कार्य हाती घेणे गरजेचे आहे.

       माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत हरित शपथग्रहण करण्यात आले.डॉ.सौ.जांभळे मॅडम यांनी उपस्थितांना शपथ दिली.प्रा. ज्ञानदेव गडलिंग यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.



       यानंतर पर्यावरण संतुलन जागृतीसाठी घोषणा देत व आजादी का आंदोलन या अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्लॅस्टिक मुक्त परिसर या अभियानाद्वारे सांगली पोलीस मुख्यालय व पोलीस अधीक्षक परिसर तसेच विश्रामबाग रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या प्लॅस्टिकचे मोठ्या प्रमाणात संकलन करून अंदाजीत ४०० ते ४५० कि.ग्रॅम वजनाचा कचरा संकलित करण्यात आला. 'प्लॅस्टिक मुक्त परिसर झालाच पाहिजे' व 'स्वच्छ भारत; सुंदर भारत' या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यानंतर पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम, उज्वल करिअर व राष्ट्र निर्माण कार्यासाठी प्रेरणा आपल्या वैचारिक मार्गदर्शनातून दिली.


      या कार्यक्रमासाठी, नेहरू युवा केंद्राच्या प्रमुख सौ.अरुणा कचुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. कु.रजनी शिंदे ,प्रा.आवळे,प्रा.गोडबोले, प्रा.हराळे ,डॉ.प्रभाकर माने व विविध महाविद्यालयातील स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाबाबत सदर घटकाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

 

   सदर शिबिरात सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेले स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा