![]() |
श्री हरि विठ्ठल |
सुप्रसिद्ध गझलकार मा.प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८ ५०८ ३० २९०)
नमस्कार ,आषाढीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... या निमित्ताने गेल्या सदतीस वर्षाच्या गझल लेखन प्रवासातील अनेक शेरांपैकी साठपेक्षा अधिक शेर...तीर्थ विठ्ठल - शेर विठ्ठल
जरी माणसे चालली पंढरीला
विठू माणसांच्याच वारीत आहे..
-------------
वारा पेक्षा वारीने समतेचा जागर होतो
मी प्रबोधनाची दिंडी त्यासाठी काढत होतो..
---------------
गझल म्हणजे चारधामी तीर्थक्षेत्रे
अन तिच्या वारीतला मी शब्दयात्री..
----------------
वीट ती मिळेल काय विठ्ठला उभारण्यास ?
बघ अधांतरी समाज राहिला युगेयूगेच....
-------------------
सर्व पापांना धुतांना बोललेली चंद्रभागा
मिळविण्याला मोक्ष येथे 'माणसांशी नीट वागा..'..
विठ्ठलाला कर्मकांडे मान्य ही नव्हतीच केंव्हा
भावभक्तीनेच त्याच्या अंतरी सर्वास जागा..
-------------
पुरे पुष्पकाची अनाहूत चर्चा
अभंगात त्याच्या बघावा तुकोबा..
सुरू पोपटांची भजन - किर्तनेही
तुकोबा कडोनी शिकावा तुकोबा..
---------------------------
तो संतांचा संस्कार कुठे ?
हा श्रद्धेचा व्यापार कुठे ?...
निरुपणाची लाख बिदागी
ज्ञानोबाला घरदार कुठे ?.....
-----------------------------
होऊ सारे विवेकवादी
कारण विठ्ठल मानववादी..
मोक्ष कल्पना गुंडाळावी
कारण विठ्ठल जीवनवादी..
गरिबांचा तो विचार करतो
कारण विठ्ठल समाजवादी..
--------- -----
संतांवर बोलत बोलत तो संतच समजत आहे
ते अमृत अनुभव आता नागोबा सांगत आहे..
विठ्ठलही विटला आहे या इथल्या भोंदुगिरीला
या आसारामी मठास तो सुरुंग लावत आहे...
--------–-------------------
जळी, स्थळी अन काष्ठी वसतो
निसर्गामध्ये विठ्ठल रमतो..
पंढरपूर हा त्याचा पत्ता
पण ,भक्तांच्या हृदयी असतो..
----------------------
ऊब गझलेत जाणवते तरी
ओवी - अभंग पांघरून बघू...
-------------- --
सुखाच्या कीर्तनाला
झडोनी द्वेष यावे....
----–--------
आरतीस गर्दी मोठी रोज भाविकांची
देवळात दिसला नाही विठू राहताना...
---------------
लेकरांच्यात हा भेद का ?
भक्त देवांवरी कोपला...
---–--------
नाही शिवारात पाणीच विठोबा
वारीतले पाय भेंडाळले आज...
----------–----
इमारती सुन्यासुन्या
विठू दिसे विटेवरी..
----------------
चरचराच्या साठी लिहून गेला ओव्या
सखा खरा विश्वाचा पसायदानी ज्ञाना...
-----------------
प्रेमरसाळी अभंग म्हणतो हे गझलेला
तुझ्या एकदा मुशायऱ्याला यावे म्हणतो...
---------- - -----
अजान वृक्षाखाली ज्ञाना हेच म्हणाला
पानोपानी गझल दिसावी नवीन वर्षी..
अभंग,ओवी, दोहा गवळण ,श्लोक म्हणाले
आपण सुद्धा गझल लिहावी नवीन वर्षी....
-----------------
त्यांच्या खऱ्या जगण्यामध्ये संतत्व शोधाया नको
ज्ञानाविना,तुकयाविना ज्यांची सुरू पारायणे...
----------------
युगेयुगे हा उभाच विठ्ठल
निवांत होते मठात सारे...
-------------
असते शपथ ज्ञात ही पायरीला
नाहीच शिखरास गाठावयाचे...
------------ -----
जागर केला ज्ञानोबाने
शेर लिहावे संत तुक्याने...
-----–------–
मी चारधाम यात्रा केली कधीच नाही
माणूस शोधतांना सरला प्रवास माझा..
------------
मी आज ज्ञानराया तुझियाच प्रेरणेने
ह्या पालखीत गझला घालून नेत आहे..
------–--------
माणूस वेगळा हा या प्रार्थनेत आहे
कोठे असेल पूजा,कोठे नमाज आहे..
---------------
एवढेच पुण्यकर्म लागलो करावयास
माणसास माणसात आणतोय आजकाल...
---------------
सांगतो ज्ञानराया ही कहाणी युगांची
स्वागताला युगांच्या थांबले शब्द माझे..
---------------
जिथे गीत माझे असे गाडलेले
तिथे बांधली मी स्वतःची समाधी...
---------- -- --
ठेवती गीतेवरी या हात सारे
पण खऱ्याने बोलण्याचा प्रश्न आहे..
--------------
अद्वैत भावनेला सांगून संत गेले
श्वासात आज माझ्या तू एकरूप व्हावे..
-------------
सूर तेथे बासरीचे ऐकतो मी
कृष्ण जेथे सोडतो रानात गाई..
धर्म येथे स्थापला मी माणसांचा
दूर गेले, सर्व माझे जातभाई...
-------------------
नाही तुक्या तुझीही गाथा तरुन गेली
गेली बुडून पाने, आल्या तरुन अफवा..
------––---
माणसांची खरी जात आहे कुठे ?
धर्म जाती मुळे विखरती माणसे..
दोष देऊ नये माणसांना उगा
शेवटी देह हा उचलती माणसे..
-------––--
येऊ कसा विठू मी गर्दीत दर्शनाला ?
नावे तुझ्या दलाली दिसतेच नेहमीची..
----------------
रोजचा व्यापार माझा हा तुक्याच्या सारखा
कोहळा देऊन हाती राहिलेला आवळा...
--–------------
भक्तांची हळहळ झाली तोतया निघाल्यानंतर
पण,प्रसाद सांगत होता मी अंध पुजारी नाही..
-----------------
विठ्याची वैरणीसाठी असे शेती
कुठे पण दूध त्याच्या लेकरा आहे ?
-------
तो पावत होता नवसाला
जो हाल स्वतः सोसत आहे..
---- ---
भट्टीत भाजलेली रखमा मला म्हणाली
माझा विठू बिचारा आहे इथे विटेवर..
------------
वाट तशी ही किचकट आहे
आयुष्याची फरफट आहे..
वाट चालूनी पाय म्हणाले
प्रवास पुढचा धुरकट आहे...
----- ---
जाहलो गझलचाच भक्त मी
वाटतो प्रसाद हा घरोघरी..
--- ---
तुला ही प्रार्थना माझी
फुलू दे वेदना माझी..
गझलने मांडली आहे
विठुची कल्पना माझी..
-----------
मानवतेला उरात ठेवा
संत वेगळा असतच नाही...
-----------
थोडा प्रकाश पसरो अंधारल्या ठिकाणी
कामात येत राहो माझे लिखाण -वाणी..
मूर्तीस दान त्याने सोने - हिरे दिलेले
थाळीत फेकतो तो कुच्छित होत नाणी...
-----------------
हृदये जोडत प्रेम घराशी होऊ शकते
माझे घरही मदिना - काशी होऊ शकते..
जमिनीवरती पडता पडता थेंब म्हणाला
माझी मैत्री पुन्हा नभाशी होऊ शकते...
------------------
सर्वस्वाचे दान द्यायचे
म्हणून जातो गाणी वाटत..
तुझ्या कृपेची पोच पावती
जीर्ण न होते..नाही फाटत...
--------------
मी प्रसादाची भुकेली
प्रार्थना हे बोललेली..
भंगलेली भिंत माझी
या विटेने जोडलेली..
---------
भक्ता तुझे जिणेही केले महाग यांनी
भरते न पोट केंव्हा ठेऊन अंधभक्ती..
सत्तेस कैक साधू- योगी हपापलेले
कपड्यांशिवाय त्यांची दिसते कुठे विरक्ती ?....
---------------------
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा