![]() |
सुयेक व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रा. डॉ. उल्हास माळकर |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
मिरज : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयांमध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि अर्थशास्त्र विभाग व शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर (सुयेक) यांच्या संयुक्त विद्यमाने सुयेक आयोजित विशेष व्याख्यानमालेंतर्गत 'स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची ७५ वर्षे' या विषयावर प्राचार्य मा.प्रा.डॉ. उल्हास माळकर यांच्यामार्फत आठवे पुष्प गुंफण्यात आले. आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी ७५ वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने काय कमाविले आणि काय गमाविले याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. माळकर म्हणाले ज्या इंग्लंडने भारतावर अनेक वर्षे राज्य गाजविले त्या इंग्लंडला मागे टाकून आज भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे. प्राचीन भारतीय अर्थव्यवस्था ही प्रगतच होती, जागतिक व्यापारातील भारताचा हिस्सा जवळपास ३५ टक्के होता. परंतु ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे भारत काहीसा मागे पडला. आज पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगत बनत आहे. हुकूमशाहीच्या माध्यमाने जरी चीनचा विकास वेगाने होत असला, तरी तो शाश्वत असणार नाही कारण तेथे मानवी मूल्ये पायदळी तुडविली जातात. म्हणून भविष्यात लोकशाहीच्या माध्यमाने भारत जगात एक विकसित देश बनेल आणि तो विकास शाश्वत, चिरकाल टिकणार असेल. अनेक बाबतीत आजही आपण परावलंबी असलो तरी स्वावलंबी बनण्यासाठी भारत अखंड प्रयत्नशील आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सतिश घाटगे
१९४७ ला अन्नधान्याची आयात करणारा भारत हरितक्रांतीच्या माध्यमाने आज जगाला अन्नधान्य निर्यात करणारा प्रमुख देश बनला आहे. १९४७ मध्ये टाचण्यांचेही उत्पादन न करणाऱ्या भारत देशामध्ये आज अभियांत्रिकी वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतीयांच्या बुद्धिमत्तेचा वापर आज जगभर महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये होताना दिसतो. अंतराळ, क्षेपणास्त्र इत्यादी क्षेत्रातील भारत एक महत्त्वाचा देश बनला आहे. भारताला उज्वल इतिहास आहे म्हणून प्राचीन संपन्न असा भारत आज पुन्हा दमदार प्रगती करत आहे. आज जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे. हे तरुणच देशाचे बलस्थान आहे. असे असले तरीही खनिज तेलाच्या बाबतीत आजही आपण आयातीवर अवलंबून आहोत, शेतीप्रधान असतानाही देशात डाळी, कडधान्य व खाद्यतेल याची आयात करावी लागते. संरक्षणाच्या बाबतीत तोफा, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, स्वयंचलित बंदुका यासाठीही देश आयातीवर अवलंबून आहे. देशामध्ये शिक्षणावरील खर्च घटला आहे. तो किमान सहा टक्के असावा. देशातील शिक्षण हे फिजिकल, मॉरल आणि डिजिटल ही असावे. तंत्रज्ञान जीवनामध्ये भौतिक समृद्धी निर्माण करते आणि तत्वज्ञान जीवन कसे जगायचे हे शिकवते म्हणूनच जीवनामध्ये या दोन्हींचा योग्य मिलाप असावा. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेती, शिक्षण, तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्रात गेल्या ७५ वर्षात झालेल्या बदलांचा परिपूर्ण आढावा घेतला. पुढे ते म्हणाले अनेकांच्या कष्टाने, आत्मबलिदानाने मिळालेले स्वातंत्र्य उपभोगताना प्रत्येकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे करण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध रहा.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर तात्कालीन धोरणकर्त्यांनी केलेल्या उपाययोजनांचे फलित म्हणून आज आपण जगात पाचव्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था बनलो आहोत. देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेले चढ-उतार, आलेली अस्थिरता त्यावर परिणाम करणारे राजकीय आणि सामाजिक घटक इत्यादीवर त्यांनी प्रकाश टाकला. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रगतीची फळे चाखताना आर्थिक प्रगतीचा प्रवास विसरून चालणार नाही. अनुभवातून शहाणपण अंगीकारणे आवश्यक आहे, आणि ही जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुएकचे विद्यमान अध्यक्ष डॉ राहुल शं. म्होपरे यांचा कार्यक्रमासाठीचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. कार्यक्रमांमध्ये सुयेकची भूमिका मांडताना कार्याध्यक्ष मा. प्रा.एम. जी. पाटील म्हणाले वैज्ञानिक युगात पारंपारिक शिक्षणाबरोबरच अर्थशास्त्राला संख्याशास्त्र व गणिताची जोड देणे आवश्यक आहे आणि यासाठी सुयेकच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राच्या अभ्यासशाखेत आवश्यक बदल केले गेलेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागातील प्रा. सौ. एस.पी. हाके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.यशवंत हरताळे यांनी करून दिला. तर आभार प्रा. संजय पाटील यांनी मांडले. सूत्रसंचालन वाणिज्य विभागातील डॉ. प्रमिला जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी सुएक चे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. महाडिक, सुयेक चे सदस्य डॉ. एम. ए. कोरे, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा