Breaking

रविवार, ९ जुलै, २०२३

*राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नावाडी सदाशिव आंबी यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी एम.ए. ची पदवी केली संपादित*


राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री.सदाशिव आंबी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व जीवन रक्षक पुरस्कार विजेते गणेश वाडी चे सुप्रसिद्ध नावाडी श्री. सदाशिव आंबी यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी एम. ए. राज्यशास्त्र विषयातून प्रथम श्रेणीमध्ये पदव्युत्तर पदवी संपादित केली. सदरची पदव्युत्तर पदवी प्राप्त करून त्यांनी सर्व घटकांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे.

       श्री.सदाशिव आंबी हे सामाजिक,धार्मिक, राजकीय व शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून आपली सेवा बजावण्याचे काम करीत असतात. नावाडी असल्याने लोकांची सेवा करणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सन २००५ मध्ये शिरोळ तालुक्यात आलेल्या प्रचंड व भयावह महापुराच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांची जीव वाचवण्यात त्यांना यश आले होते. याची दखल घेत केंद्र शासनाने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला होता.यानंतर सन २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या काळातही अशीच प्रामाणिक व देशभावी सेवा त्यांनी पार पाडली होती.सन २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात ही त्यांचे समाजाप्रती असलेलं विशेष सेवाभावी कार्य दिसून आले. शासनाने आयोजित केलेल्या महापुर निवारण कार्यशाळेत महापुराची कारणे व उपाय याविषयी अभ्यासपूर्ण भाषण करून शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. उत्तम वक्तृत्व व अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ते उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे धडाकेबाज शिलेदार म्हणूनही त्याची ओळख आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.शिरोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य म्हणून ही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणाची गटारगंगा आपल्या कार्यातून साफ करण्याचा प्रयत्न केला. आपल्या फंडाच्या माध्यमातून अनेक फलदायी योजनांचा लाभ समाजाला देण्याचा प्रयत्न केला.

   शांत-संयमी उत्तम वाणी, मानव केंद्रित सेवाभाव, साधी राहणी व उच्च विचारसरणी या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्व नजरेसमोर येते. अत्यंत गरीब कुटुंबातून त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नव्हते. मात्र शिक्षणावर असलेली अटळ श्रद्धा मुळे त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए. राज्यशास्त्र विषयातून पदवी संपादित केली होती.यानंतर लगेच श्री.सदाशिव आंबी यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी एम.ए.ला ६२ % गुण प्राप्त करून पदव्युत्तर पदवीचे यश संपादन केले.

       जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना श्री. आंबी म्हणाले, लोकांची सेवा करणे हे माझे आद्य कर्तव्य असून यापुढेही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच शैक्षणिक प्रवासातील पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी संपादन करण्याचा  मानस असल्याचे ते म्हणाले. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या सर्व घटकांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन सुप्रसिद्ध नावाडी सदाशिव आंबी यांचा आदर्श घ्यावा. सदाशिव आंबी जी  जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन! आपल्या पुढील सामाजिक व शैक्षणिक कार्यास खूप खूप शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा