आपल्या रोजच्या वापरातील खाद्यतेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसून आलं आहे. पण या किंमती नेमक्या कशामुळे वाढत आहेत?
कोरोना काळात पसरणाऱ्या साथीचं संकट आणि त्यासोबत लॉकडाउनचे निर्बंध यामुळे आधीच पिळून निघालेल्या सामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. पाच राज्यांच्या निवडणुका होण्याआधी पेट्रोलचे दर प्रचंड वाढले होत. निवडणुकांदरम्यान त्यांची वाढ थांबली. काही प्रमाणात दर कमी देखील झाले. पण निवडणुकांनंतर ते पुन्हा वाढले आणि आता शंभरी गाठू लागले आहेत. त्याचप्रमाणेत घरोघरी स्वयंपाकासाठी आणि इतर कारणांसाठी वापरलं जाणारं खाद्यतेल देखील या काळात प्रचंड प्रमाणात महागलं. विशेषत: गेल्या वर्षभरात सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये २० ते ५६ टक्क्यांदरम्यान वाढ झाल्याचं दिसून आलं. अजूनही ही वाढ होतच असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
पण नेमकं असं झालं तरी काय, की या तेलाच्या किंमती अचानक एवढ्या वाढू लागल्या?
नेमकी किती वाढ आहे?
भारतीय बाजारपेठेत शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल, सोयाबीन तेल, सनफ्लॉवर तेल आणि वनस्पती तेल अशा सहा प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. या सर्व तेलांच्या किंमती गेल्या वर्षभरात २० टक्के ते ५६ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. मोहरीच्या तेलाची किंमत ४४ टक्क्यांनी वाढून १७० रुपये प्रतिकिलोच्या आसपास झाली आहे. गेल्या वर्षी हीच किंमत ११८ ते १२० रुपये प्रतिकिलो इतकी होती. सोयाबीन आणि सनफ्लॉवर तेलाच्या किंमंतीतही जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: मे महिन्यात या तेलांच्या किंमतींमध्ये घसघशीत वाढ झाली.
१९९३-९४ ते २००४-०५ दरम्यान ग्रामीण भागात प्रतिमाणशी तेलाचा वापर महिन्याला ३७० ग्रॅमवरून ४८० ग्रॅम सरासरी इतका वाढला. शहरी भागात हे प्रमाण ५६० वरून ६६० ग्रॅम इतकं झालं. तेच प्रमाण २०११-१२ पर्यंत ग्रामीण भागात ६७० ग्रॅम तर शहरी भागात ८५० ग्रॅम इतकं झालं. त्यापुढील काळात देखील या प्रमाणात सातत्याने वाढ होत राहिली आहे.
तेल महागाईचं मूळ!
भारत आपल्या गरजेच्या जवळपास 55 ते 60 टक्के तेल आपण आयात करतो. त्यामुळे या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात. व ज्या देशाकडून आपण तेल आयात करतो तेथेच नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना निर्बंध मूळे तेलाचे उत्पादन कमी झाल्याने किमती वाढल्या आहेत.
केंद्रीय कृषीविभागाच्या आकडेवारीनुसार २०१९-२०मध्ये देशात खाद्यतेलाची एकूण मागणी होती २ कोटी ४० लाख टन. त्यातील जवळपास १ कोटी ३० लाख टन तेल आपण बाहेरून आयात केलं आहे.
इंधननिर्मितीमुळे किंमती वाढल्या?
सोलव्हंट एक्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएआयचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
आपल्या फूड बास्केटमधून खाद्यतेल मोठ्या प्रमाणावर फ्युएल बास्केटमध्ये जात असल्याचं मेहता यांचं म्हणणं आहे. अमेरिका, ब्राझील आणि इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन तेलापासून इंधन निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. करोनाचं संकट असूनही अशा प्रकारच्या खाद्यतेलाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुरवठा अपुरा पडून किंमतवाढीला मोठा हातभार लागला. याशिवाय, चीनकडून अधिकाधिक साठ्याची खरेदी, मलेशियामधील मजूरांचा तुटवडा ला निना वाऱ्यांचा पाम आणि सोयाबीन उत्पादन क्षेत्रावर होणारा परिणाम आणि इंडोनेशिया-मलेशियामध्ये असलेली कच्च्या पाम तेलाच्या निर्यातीवर असणारे भरमसाठ कर यामुळे देखील आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलांचा पुरवठा अपुरा पडू लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा