![]() |
प्रा.सुनंदा पाटील |
प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
इचलकरंजी ता. १९ गझल ही देता अथवा शिकविता येणारी विद्या नाही तर ती कला आहे. गुरूच्या हातातून ती चिमटीत उचलून घ्यावी लागते.दगडातील अनावश्यक भाग काढून टाकला की सुबक मूर्ती आकाराला येते.त्याच पद्धतीने सुरेश भट उर्फ दादांनी चांगले काव्यगुण असलेल्या नव्या पिढीकडे गझलेची कला सुपूर्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.त्यातील अनेक गझलकारांपैकी मधुसूदन नानिवडेकर हे एक दर्जेदार गझलकार होते.त्यांच्या अचानक कालवश होण्याने मराठी गझलेची मोठी हानी झाली आहे.त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गझलसाद संस्थेच्या वतीने वाहण्यात आलेली ही शब्द-भाव- गझल सुमनांजली नानीवडेकरांना सार्थ अभिवादन करणारी आहे.असे मत ज्येष्ठ गझलकारा प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा ( मुंबई ) यांनी व्यक्त केले.त्या गझलसादच्या वतीने आयोजित 'मधुसूदन नानिवडेकर स्मृती ऑनलाईन मुशायऱ्याच्या 'अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.प्रारंभी गझलसादचे निमंत्रक प्रा.नरहर कुलकर्णी यांनी स्वागत केल्यावर नानिवडेकर यांना अभिवादन करण्यात आले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.या मैफलीचे अतिशय प्रभावी व नेटके सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांनी केले.या मैफलीत डॉ.दिलीप कुलकर्णी, हेमंत डांगे, डॉ.संजीवनी तोफखाने, प्रवीण पुजारी,डॉ.दयानंद काळे, सारिका पाटील,सुधीर इनामदार, प्रताप पाटील,प्रा.नरहर कुलकर्णी,डॉ.सुनंदा शेळके आणि प्रसाद कुलकर्णी हे गझलकार सहभागी झाले होते.
प्रा.सुनंदा पाटील यांनी गद्य ही विद्वत्तेची रांग असते तर पद्य तुक्याचा अभंग असतो हे स्पष्ट करत सुरेश भट यांच्या आठवणी,गझलेचे तंत्र व मंत्र,मधुसूदन नानिवडेकर यांची लेखन वैशिष्ट्ये, गझलप्रवास यांचा जागर केला.तसेच 'पाच शेरांनी मला समृद्ध केले,फक्त जखमांचा जरा विस्तार झाला ' पासून 'आई म्हणते बरेच झाले मुलगी झाली,तिच्या पित्याला किमान आता बाई कळली ' पर्यंतचे अनेक शेर असलेल्या गझल सादर केल्या व गझलेबाबत मार्गदर्शन केले.या मैफलीची सुरुवात डॉ.सुनंदा शेळके यांनी ' भल्या पहाटे कसे अचानक गेला तुम्ही?आयुष्याचा रिताच केला पेला तुम्ही,गझले मधला एक निरागस, सज्जन माणूस,तुमच्या सोबत नानिवडेकर नेला तुम्ही.
या शब्दांनी नानिवडेकर यांना आदरांजली वाहत केली.त्यानंतर या मैफलीत विविध रसांच्या गझला सादर झाल्या.
हेमंत डांगे यांनी ' जेंव्हा मिळतो मेवा,तेंव्हा घडते सेवा,गझल तुझ्यावर लिहितो,लाभे मला अरे व्वा ' ही छोट्या बहर मधील गझल सादर केली.प्रताप पाटील यांनी ' निघून गेला निघून जाणारा, आठवणींचा ठेवून पसारा ' या गझलेतून
व्याकुळता मांडली.प्रा.नरहर कुलकर्णी यांनी,'जगतांना ज्या प्रश्नांनी मज छळले होते,प्रश्न सर्व ते सुटतील का रे मी गेल्यावर ? या शब्दांत जगण्याचे न सुटणारे प्रश्न मांडले.डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी ' रे मना , चाळू नको दैनंदिनी तू ,सांत्वनाला तीत कोरा ताव नाही ' असे म्हणत मानसिक आंदोलने मांडली.
सारिका पाटील यांनी,'नातीगोती नकोत कोणा विभक्त झाली घरे म्हणोनी ,खळखळून ना हसते रडते लेकुरवाळी न्हाणी हल्ली ' असे म्हणत कुटुंबाच्या विभक्तीकरणाची वेदना मांडली. सुधीर इनामदार यांनी,'सूर्य मी होऊन त्यांना खूप होते शोधले,शेवटी अंधार झालो आणि तारे भेटले ' असे म्हणत उजेड - अंधाराचे अनोखे दर्शन घडविले.डॉ.दयानंद काळे यांनी वेदनेला अंत नाही ,सौख्य जातिवंत नाही ' या शब्दात सनातन दुःख व अल्पकालीन सुख यांची मांडणी केली.प्रविण पुजारी यांनी 'दिवस उगवतो मावळलेला तू हसल्यावर,क्षणात एका मी फसलेला तू हसल्यावर ' असा प्रेमरसाची कबुली दिली.
डॉ.संजीवनी तोफखाने यांनी,' पावलांना ओढ लागे लोचनांना आहे देवा,दर्शनाने तॄप्त करते मूर्त काळी पांडुरंगा,वेदनांना भीत नाही दुःख ही दे रे कितीही,सोसण्याची शक्ति देई मात्र भाळी पांडुरंगा ' अशा शब्दात आषाढीच्या निमित्ताने आर्जव केले.प्रसाद कुलकर्णी यांनी 'बोलतो ते येत असते माझिया आतून मित्रा,कोणता देऊ पुरावा मी तुला याहून मित्रा,चाळणी उपयुक्त ठरते सत्व शोधाया म्हणोनी, मी स्वतःला घेत असतो नेहमी चाळून मित्रा ' असे सांगत मधुसूदन नानिवडेकर या मित्राला आदरांजली वाहिली.सव्वा दोन तास चाललेल्या या मुशायऱ्याची सांगता,'थांबणे आता मला मंजूर नाही,पर्वताला मात द्यावी वादळाने ' या अध्यक्षीय गझलेने झाली.हा मुशायरा ,उत्तम अध्यक्षीय भाषण,प्रभावी सूत्रसंचालन आणि सर्व रसांचा परिपोष करणाऱ्या गझला यामुळे अनेक अर्थानी आशयपूर्ण ठरला.असंख्य श्रोत्यांनी यात सहभाग नोंदवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा