Breaking

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

*डिजिटल माध्यमांना गुणवत्ता,तंत्रज्ञानाची जोड व बाजारस्नेही धोरणांची गरज : मा.विश्‍वनाथ गरुड,पुणे*

 

मा. विश्वनाथ गरुड, डिजिटल माध्यम अभ्यासक


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


     कोल्हापूर :डिजिटल माध्यमांची गुणवत्तापूर्ण व बाजारस्नेही धोरणांची नितांत आवश्यकता आहे. तसेच डिजिटल माध्यमांतून सध्या तितकासा गंभीर आशय तयार होत नाही; परंतु, यापुढील काळात गुणवत्तापूर्ण आशयावरच या माध्यमांची भिस्त असेल, असे मत पुणे येथील डिजिटल माध्यम अभ्यासक विश्‍वनाथ गरूड यांनी आज येथे व्यक्‍त केले.

   शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने ‘कोरोनानंतरचा डिजिटल मीडिया’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते.

      श्री. गरूड म्हणाले, ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर वाढत आहे. नजीकच्या काळात डिजिटल माध्यमांचा वापरही तेथे वाढणार आहे. तथापि, या माध्यमांनी माहिती,ज्ञान, प्रबोधन आणि सकस विचार देण्याचे कामही जाणीवपूर्वक केले पाहिजे, तरच समाज त्यांच्याकडे गांभीर्याने बघेल. 

    सद्यपरिस्थिती सुरू असलेल्या थिल्लर माहितीच्या आधारावरील माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. लोकांना घाबरवणे, थिल्‍लर माहिती देणे अशा गोष्टींपासून डिजिटल माध्यमांनी दूर राहिले पाहिजे. गंभीरपणे विचारपूर्वक आशयाची निर्मिती केली तरच या माध्यमांना भवितव्य आहे. यापुढील काळात केवळ चांगला आशय असून उपयोग नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जोडही आवश्यक आहे.

     श्री. गरूड पुढे म्हणाले, डिजिटल माध्यमांना बाजारस्नेही धोरण स्वीकारणे अपरिहार्य आहे. परंतु बाजाराच्या किती आहारी जायचे, याचाही विचार त्यांना करावा लागेल. व्यवसाय आणि कर्तव्य याच्यात मेळ साधणे आवश्यक आहे. कोरोनानंतरही डिजिटल माध्यमांतील अनिश्‍चितता आणि अस्थिरता कायम रहाणार आहे. त्यामुळे या माध्यमांत करिअर करताना अस्थिरतेचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे.

तसेच, यापुढील काळात व्हिडिओ आणि ऑडिओचा आशय वाढणार आहे. दृश्य स्वरूपातील आशयाची मागणी सातत्याने वाढत आहे. यासाठी डिजिटल माध्यमांनी व्हिडिओ किंवा पॉडकास्टिंगकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. उत्तम गुणवत्ता असलेला आशय निर्माण झाला तरच वर्गणी भरून लोक डिजिटल माध्यमांकडे आकर्षित होतील. अन्यथा या माध्यमांचे आर्थिक सक्षमीकरण होणार नाही.

    यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वेबिनारला विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       या अध्यासन केंद्र वेबीनारच्या  माध्यमातून असंख्य घटकांना वैचारिक शिदोरी व माहिती प्राप्त झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा