श्री क्षेत्र नृसिंहवाडी |
महेश शा. कुलकर्णी : विशेष प्रतिनिधी
नृसिंहवाडी : काल मंगळवारी(१९/७/२९२२) रात्री ८.३० च्या दरम्यान श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उतरता दक्षिणद्वार सोहळा झाला. व याचा अनेक भक्तांनी लाभ घेतला. त्यापुर्वी उत्तरेकडुन कृष्णा- वेण्णा व पश्चिमेकडुन पंचगंगा नदीच्या क्षेत्रात पुर आल्याने या सप्त नद्यांचे पाणी ८ दिवसांपुर्वी नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरात उत्तरद्वारातुन आत शिरुन,साक्षात कृष्णावेण्णा मातेने श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकांवर जलाभिषेक केला व दक्षिणद्वारातुन बाहेर पडत असणार्या या पवित्र तिर्थात स्नान करण्याचा व ते तिर्थ प्राशन करण्याच्या दुर्मिळ सुसंधीचा हजारो भाविकांनी लाभ घेतला होता. त्यानंतरही पुराचे पाणी वाढतच असल्याने, प्रथेप्रमाणे नारायण स्वामींच्या मंदिरातील, श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या उत्सवमुर्तीची पुजा व अभिषेक-पादुकांवर दैनंदिन अभिषेक करण्यात येत होते. मात्र गेल्या ४ दिवसांपासुन या सप्त नदीक्षेत्रातील पाऊस ओसरल्याने तब्बल साडेसात दिवसानी पादुकांवरील पाणी पुन्हा नदीकडे जावु लागले. "पाणी जेव्हा कमी होत होत पादुकांच्या पातळीला येते या क्षणालाच उतरता दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात". व या वेळीही अनेक भक्त स्नानाचा लाभ घेतात. पादुकांवरील पाणी पुर्ण निघुन गेल्याने, मंदिराची स्वच्छता करुन, मंदिर धुवुन आजपासुन(२०/७) या पादुकांवरील दैनंदिन पुजाविधीही सुरु झाले.
आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसांनाही पावसाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी इ. आजार सुरु होतात. मग श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे तर सगळ्या जगाचे गुरु, माता, पिता सर्व काही. त्यांच्या पादुका(पावले) म्हणजेच प्रत्यक्षात महाराजच जेव्हा पुरामुळे पाण्यात रहातात तेव्हा त्यांना किती त्रास होत असेल ? त्यांच्या पादुकांना(पावलांना) किती सुज येत असेल ? अशी कल्पना करुन, असा विचार करुन उतरते दक्षिणद्वार झाल्यावर (पादुकांवरील पाणी ओसरल्यावर) महाराजांना ७ दिवस पहाटे काकड आरतीच्या वेळी व रात्रीच्या आरतीच्या वेळी असा दोनदा गरमा गरम "औषधी काढ्याचा नैवेद्य" दाखवण्यात येतो. यानंतर हाच काढा भक्तांना "तिर्थ" रुपाने वाटला जातो. या काढ्यामध्ये काढ्याच्या साहित्याबरोबरच सर्वोत्तम असे अनेक प्रकारचे गरम मसाले वापरलेले असतात. या काढ्याची चव केवळ अवर्णनीय. एखादा जर आजारी असेल व त्याने हा काढा चमचाभर जरी प्राशन केला तरी त्याचा आजार पळुन जाईल. यात तिळमात्र शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा