Breaking

शनिवार, १ एप्रिल, २०२३

*आपले ज्ञान व प्रामाणिकतेच्या आधारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकासासाठी शिक्षक वर्ग सर्वतोपरी कटिबद्ध असणे गरजेचे : प्रा.डॉ. सुखदेव थोरात*


डॉ.सुखदेव.थोरात यांना डॉ.जे. एफ. पाटील मेमोरअल अवॉर्ड प्रदान करताना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, सोबत प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, डॉ.सौ. व्ही.पी.कट्टी व डॉ. राहुल म्होपरे 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : आपल्या ज्ञान व प्रामाणिकतेच्या आधारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकासासाठी शिक्षक वर्ग सर्वतोपरी कटिबद्ध असणे गरजेचे आहे.आपल्या संपादित ज्ञानाच्या आधारे सरकारला व्यापक सामाजिक हिताच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करणे शिक्षकांची जबाबदारी आहे, ती त्यांनी निर्भयपणे निभावली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन प्रा. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.


      शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन (सूयेक) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित करण्यात आलेला पहिला ‘प्रोे.डॉ.जे. एफ.पाटील मेमोरेअल अवॉर्ड २०२३ चा  यूजीसी चे माजी चेअरमन प्रा.डॉ. सुखदेव थोरात यांना शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. विलास शिंदे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सौ. व्ही.पी.कट्टी व सुयेकचे अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे प्रमुख उपस्थित होते.

    प्रा. थोरात यांनी आपल्या भाषणात डॉ. जे.एफ. पाटील यांचेच उदाहरण देत शिक्षकांवरील जबाबदारीचे अधोरेखन केले. ते म्हणाले, डॉ. पाटील यांच्या जीवनकार्यापासून एक धडा शिक्षकांनी अवश्य घ्यायला हवा, तो म्हणजे ज्ञानसंपादनाचा आणि ते समाजाला वाटण्याचा. शिक्षक ज्ञानाच्या क्षेत्रात असल्यामुळे त्याला इतरांपेक्षा लवकर ज्ञान मिळते. ते ज्ञान समाजाच्या हितासाठी देत राहण्याचा धडा डॉ. पाटील यांनी दिला आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत व्यक्तीस्वातंत्र्यावर, लेखनावर, अभिव्यक्तीवर मर्यादा येत असतात; परंतु अशा काळातही शिक्षकांनी आपली समाजशिक्षकाची भूमिका सोडता कामा नये. विविध सामाजिक-आर्थिक विषयांच्या अनुषंगाने सरकारला मार्गदर्शन करीत राहिले पाहिजे. नवे शैक्षणिक धोरण, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आदी शैक्षणिक बाबींच्या संदर्भातही अशा मार्गदर्शनाची जबाबदारी त्यांनी निभावली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. डॉ.जे. एफ.पाटील यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य हे समाज केंद्रित होते. याचा धडा घेऊन प्रत्येक शिक्षकाने त्याचे अनुकरण केले पाहिजे.

    डॉ. जे.एफ. पाटील यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग अत्यंत गांभीर्यपूर्वक व प्रामाणिकपणे समाजहितासाठी वापरले. त्यांनी अर्थसंकल्पापलिकडेही विविध सामाजिक-आर्थिक विषयांवर चिंतनपर समतोल मांडणी केली, प्रबोधन केले. काही व्यक्ती आयुष्यभर लोकांच्या जीवनात सतपरिवर्तन आणण्यासाठी मोठा झगडा मांडतात, त्या जनमानसात चिरंतन राहतात. त्यांच्यामाघारी त्यांचा हा वारसा समाजाला प्रेरित करीत राहतो. डॉ. पाटील यांचा वारसा हा असा चिरंतन राहील, असे गौरवोद्गार प्रा. थोरात यांनी यावेळी काढले.

   कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये सेवा बजावलेल्या शिक्षकाच्या नावे देण्यात येणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. डॉ. जे.एफ. पाटील यांनी समाजाशी निगडित विविध प्रश्नांवर धाडसी आणि चिंतनपूर्ण मांडणी केली. त्यामुळे समाजाशी जोडला गेलेला एक अर्थतज्ज्ञ असे त्यांचे वर्णन करावे लागेल. त्यांनी केवळ अर्थशास्त्रीय विषयांच्या बाबतीतच मांडणी केली नाही, तर समाजावर प्रभाव टाकणाऱ्या त्या पलिकडीलही अनेक विषयांवर चिकित्सक प्रकाश टाकला. मी स्वतः विद्यार्थी दशेपासून डॉ.पाटील यांचं कार्य जवळून पाहिलेला आहे. इचलकरंजी समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रबोधन प्रकाशन ज्योती या मासिकेच्या माध्यमातून सातत्याने विविध विषयावर वास्तव लेखन केले. सती शेवटी म्हणाले, या पुढेही पुरस्कारचे मानकरी निश्चित करताना पुरस्काराची उच्च कोटीची पातळी अशीच टिकून राहावी अशी अपेक्षाही व्यक्ती केली.

   यावेळी अर्थशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा.डॉ.सौ.विद्या कट्टी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकेतून डॉ.जे.एफ.पाटील सरांनी आजतागायत अर्थशास्त्र विषयाच्या सर्वांगीण विकासात्मक प्रगतीसाठी केलेल्या अर्थशास्त्र विषयाची महती व त्यांचे कार्य सविस्तरपणे सांगितले. प्रा.डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रा. थोरात यांचा उपस्थिताच्या मध्ये ऊर्जा निर्माण करणारा जीवन पटाचा थोडक्यात परिचय करून दिला. 

  अर्थशास्त्र परिषदेचे (सुयेकचे) अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली व मानपत्राचे वाचन केले. शीतल माने यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

  या प्रसंगी डॉ. जे.एफ. पाटील यांच्या पत्नी कमल पाटील त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होत्या. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यासह अर्थशास्त्राचे आजी-माजी शिक्षक, परिषदेचे सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, तसेच डॉ. जे. एफ.पाटील प्रेमी शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      आजचा पुरस्कार प्रदान सोहळा प्रत्येकाला  प्रेरणा देणार होता अशा प्रकारची चर्चा उपस्थित घटकांच्या मध्ये होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा