Breaking

मंगळवार, ६ जून, २०२३

*शिवरायांच्या स्वराज्य उभारणीत मावळ्यांचे रक्त, शेतकऱ्यांचा घाम व रयतेचा त्याग कामी ; रयतेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याभिषेक : प्रा.डॉ.प्रभाकर माने यांचे प्रतिपदन


मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रभाकर माने व प्राचार्य प्रा.डॉ. आर.एस.कदम ,प्रा.डॉ.सुनील चव्हाण व प्रा.डॉ.दिपक सुर्यवंशी 

*प्रा.डॉ.मनोहर कोरे : उपसंपादक*


कुरुंदवाड : मावळ्यांचे रक्त, शेतकऱ्यांचा घाम व रयतेचा त्याग कामी आला असून अठरापगड जातीच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली आदर्शवादी स्वराज्याची उभारणी केली असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले.

      सहकारभूषण एस.के.पाटील महाविद्यालय कुरुंदवाड आयोजित शिवस्वराज्य दिन अर्थात ३५० व्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ. प्रभाकर माने, अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.आर.एस.कदम व प्रा.डॉ.सुनील चव्हाण उपस्थित होते.

     याप्रसंगी मार्गदर्शन करताना जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ.प्रभाकर माने म्हणाले, शिवरायांनी तमाम रयतेसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. राज्याभिषेक सोहळा हा अखिल हिंदुस्तानासाठी स्वाभिमानाची नाही तर अभिमानाची बाब होती. स्वराज्य निर्मितीसाठी मदत करणाऱ्या मावळ्यासाठी हा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहावा असा होता. महाराजांना राजेपद मिळणार असल्याने संपूर्ण रयतेची ते वाली झाले. मुळात ३५० वर्षापूर्वी जुलमी व्यवस्था रुपी पातशाही व राजकारण संपविण्यासाठी तलवारीच्या पात्यावर व उत्तम राजकारणाच्या जोरावर  सत्ताधिशांना नेस्तानाबुत व जेरीस आणण्याचा प्रयत्न केला.

    डॉ.प्रभाकर माने पुढे म्हणाले, महाराजांच्या यशाचे गुपित म्हणजे शत्रूला मारणारे व प्रसंगी शिवरायासाठी मरणारे अठरापगड जातीचे मावळे होते. याच्या जोरावर  शिवबाने स्वराज्याची उभारणी केली. सम्राट, बादशहा व महाराणा अशी बिरुदे लावून स्वतःचं मोठेपण मिरविता आले असते. मात्र जनतेच्या अस्तित्व व सुरक्षिततेसाठी रायगडावर राज्याभिषेक करून छत्रपती हे बिरूद लावले आणि खऱ्या अर्थाने तमाम रयतेचे लोककल्याणकारी राजे अर्थात जनतेच्या डोक्यावर छत्र धरणारा छत्रपती बनले. त्यामुळे राज्याभिषेक सोहळा हा आम जनतेचा सोहळा असून अखंड मानवतेचा विचार करणारा आनंददायी लोकोत्सव आहे.

        अध्यक्ष स्थानावर बोलताना प्राचार्य प्रा.डॉ. आर.एस.कदम म्हणाले, शिवस्वराज्य दिन- राज्याभिषेक सोहळा हा तमाम जनतेसाठी प्रेरणादायी,राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि आदर्शवादी कल्याणाची राज्य व्यवस्था दर्शविणारा सोहळा आहे.

   सुरवातीस छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. दिपक सुर्यवंशी यांनी केले.या कार्यक्रमाचे उत्तम  सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.एस.शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचं नेटके नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते.

     या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्रशासकीय सेवक-कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा