Breaking

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

*शिवाजी विद्यापीठात ‘एक तारीख, एक घंटा’ स्वच्छता मोहिम संपन्न*

एक तारीख -एक घंटा स्वच्छता अभियानात कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ .विलास शिंदे, एन.एन.एस. संचालक डॉ. तानाजी चौगले व इतर मान्यवर व एन.एन.एस स्वयंसेवक

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने आज ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या ‘एक तारीख, एक घंटा’ ही स्वच्छता मोहिम शिवाजी विद्यापीठामार्फत उत्साहात राबविण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ विद्यापीठ परिसरच नव्हे, तर विद्यापीठ परिसराबाहेरील शासकीय तंत्रनिकेतनपर्यंतचा परिसरही या मोहिमेअंतर्गत स्वच्छ करण्यात आला.

मा.कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचा स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग 

       शिवाजी विद्यापीठाच्या सर्व घटकांना स्वच्छता करावयाचा परिसर नेमून देण्यात आला होता. त्यानुसार हलक्या पावसाच्या सरी पडत असतानाही प्रत्येक अधिविभागातील शिक्षक, विद्यार्थ्यांसह प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या त्या परिसराची स्वच्छता केली. विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि राजाराम महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी डॉ. आप्पासाहेब पवार चौकापासून ते शासकीय तंत्रनिकेतन या जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील टप्प्यात नव्याने निर्माण झालेल्या खाऊ गल्ली परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेमध्ये कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ. अमोल कुलकर्णी यांनी पूर्णवेळ सहभाग घेतला. या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुशांत तावडे हेही आपल्या आठ कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहिले. या परिसरामधून प्लास्टीकच्या पिशव्या, पोती, ओला व सुका कचरा, प्लास्टीक बाटल्या, मद्याच्या काचेच्या बाटल्या, खाऊ गल्लीतील टाकाऊ अन्न पदार्थ यांच्यासह रस्त्याकडेला उगवलेली काटेरी झुडपे व अन्य कचरा गोळा करण्यात आला. दोन टिपर भरून सुमारे दोन टन कचरा या परिसरातून उचलण्यात आला.

  दरम्यान, विद्यापीठामधील प्लास्टीक कचऱ्याचे प्रमाण मात्र नगण्य राहिले. विद्यापीठात स्वच्छतेचा संस्कार सातत्याने बिंबविला जात असल्याचे प्रतिबिंब आजच्या या मोहिमेतून आले. विद्यार्थ्यांसह अभ्यागत हे ठिकठिकाणी कचरा उठावासाठी ठेवलेल्या कुंड्यांचा वापर करीत असल्याने आणि त्याची योग्य प्रकारे निर्गत केली जात असल्याचे यातून स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांनी यापुढील काळातही आपला विद्यापीठ परिसर असाच स्वच्छ, सुंदर आणि विशेषतः प्लास्टीकमुक्त राहण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा