Breaking

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थ्यांच्या सर्वकष विकासासाठी एक सुवर्णसंधी : अधिष्ठाता प्रा.डॉ.महादेव देशमुख यांचे प्रतिपादन*


राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करताना मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, अध्यक्षीयस्थानी मा.राजगोंडा पाटील, डॉ.आर.डी.जेऊर व डॉ. मनोहर कोरे


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सांगली : मिरज महाविद्यालय मिरज व विलिंग्डन महाविद्यालय सांगली यांचे संयुक्त विद्यमाने 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020' या विषयाच्या अनुषंगाने एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगोंडा पाटील हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ. महादेव देशमुख हे लाभले होते. अध्यक्षस्थानी  मिरज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंदराव जाधव होते. विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर हे विशेष उपस्थित होते.

   प्रा.डॉ. महादेव देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले,विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मिळणारे  शिक्षण आणि अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्राला आवश्यक असणारे मनुष्यबळ यांच्यामध्ये ताळमेळ असावा, त्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी तशी शिक्षणव्यवस्था व शैक्षणिक धोरण असणे गरजेचे आहे. या गोष्टीची पूरेपूर काळजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात घेतलेली असून हे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्व विकासासाठी एक सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन केले.विद्यार्थी लोकल न राहता ग्लोबल झाला पाहिजे त्या पार्श्वभूमीवर त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत या दृष्टीने प्रयत्न करणे हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे.  शिक्षणाबरोबरच त्याच्याकडे एखादं कौशल्य असावे जेणेकरून विद्यार्थी नोकरी मागणारा न होता नोकरी देणारा होईल  या हेतूने या धोरणात  कौशल्य विकासावर अधिक भर दिला आहे.

  डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, भारतास एकेकाळी  सोने की चिडिया असे संबोधले जात होते. जगाच्या एकूण व्यापारामध्ये एकट्या  भारताचा ३३ टक्के होता. आज देशात ६५ टक्के लोकसंख्या ही तरुण अर्थात सरासरी वय २६ ते २९ वर्ष  इतके आहे. हा तरूण वर्ग हीच खरी भारताची ताकद आहे. या तरुणाईला चांगलं  आणि कौशल्यपूर्ण शिक्षण दिले तर निश्चितपणे भारत देश सन २०४७ पर्यंत भारत विकसित बनेल.मानवी जीवनात शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे.चांगले शिक्षण मिळाले की आरोग्य सुधारते आणि चांगले जीवनमान मिळते यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही एक सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करून स्वतःला घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असे ते म्हणाले.

       या चर्चा सत्राचे समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर.डी.जेऊर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय विलिंग्डन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. एम.ए.कोरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. पी. पाटील मॅडम यांनी व्यक्त केले. 

     आपल्या सहज आणि  ओघवत्या भाषेमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.एस केरीमाने मॅडम यांनी केले. यावेळी दोन्ही महाविद्यालयातील ३१ प्राध्यापक व १५३ विद्यार्थी  उपस्थित होते.आणि ऑनलाइनच्या माध्यमातून ही प्रक्षेपण झाल्याने २२५ पेक्षा अधिक विद्यार्थी व प्राध्यापकांनी याचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा