![]() |
आयोजित व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील, सचिव प्रा.राजू झाडबुके, अध्यक्ष प्रा. डॉ अनिलकुमार वावरे, डॉ.मारोती तेगमपुरे, प्राचार्य डॉ. उल्हास माळकर व डॉ. राहुल म्होपरे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
मिरज : भारतातील वाहतूक व्यवस्था ही देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. ती केवळ वस्तू आणि सेवा पोहचवण्यासाठी महत्वाची नसून, रोजगार निर्मिती, क्षेत्रीय विकास आणि सामाजिक एकात्मतेसाठीही मोलाची भूमिका बजावते असे प्रतिपादन प्रा. डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले.मिरजेतील कन्या महाविद्यालयात "भारतातील वाहतूक व्यवस्थेचे अर्थशास्त्र" या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार वावरे उपस्थित होते. प्रमुख उपस्थित म्हणून दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. राजू झाडबुके होते. मिरजेतील कन्या महाविद्यालयात मराठी अर्थशास्त्र परिषद,मुंबई व अर्थशास्त्र विभाग,कन्या महाविद्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान संपन्न झाले.
कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उल्हास माळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करीत डॉ.शंकर मोडक व्याख्यानमालेचे महत्व विशद केले. अर्थशास्त्र विभागाचे डॉ.संतोष शेळके यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉ. जगन्नाथ पाटील यांनी भारतातील वाहतूक व्यवस्था ही देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असून अर्थव्यवस्थेच्या गतिशील प्रगती व जलद विकासाचा मार्ग आहे.ती केवळ वस्तू आणि सेवा पोहचवण्यासाठी महत्वाची नसून, रोजगार निर्मिती, क्षेत्रीय विकास, आणि सामाजिक एकात्मतेसाठीही मोलाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. देशातील वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि उद्योग व्यवसायांच्या गरजांसोबत वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या व्यवस्थेचे अर्थशास्त्रीय महत्व समजून घेणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी स्थल वाहतूक, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक या तीन विभागांची सविस्तर माहिती उपस्थिताना दिली. तसेच त्यांनी आर्थिक विषमतेवर भाष्य करत श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याने आणि गरीब अधिक गरीब होत असल्याने ही दरी कमी करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट करत मानवाच्या शरीरातील रक्तवाहिन्यांसारखी वाहतुकीची भूमिका भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी भारतातील वाहतूक व्यवस्थेला देशाच्या आर्थिक विकासाचा कणा म्हणून संबोधले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यवाह प्रा.डॉ. मारोती तेगमपुरे यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त करून परिषदेच्या माध्यमातून अर्थशास्त्र विषयाच्या गहन अभ्यासाला चालना देणे, स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे या उद्दिष्टांची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. तसेच याप्रसंगी डॉ.राहुल म्होपरे यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार वावरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भारतातील वाहतूक व्यवस्थेचा विकास हा आर्थिक प्रगतीसाठी कणा ठरत असल्याचे सांगून तंत्रज्ञान व नियोजनाचा समन्वय साधून वाहतूक व्यवस्थेतील आव्हानांना संधींमध्ये बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले. शाश्वत व समतोल वाहतुकीने केवळ अर्थव्यवस्थाच नव्हे, तर पर्यावरणालाही आधार मिळेल. यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश निकम, प्रा अर्जुनराव महाडीक , प्रा. मनोहर कोरे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. सुनीता माळी प्रमुख उपस्थित म्हणून होते. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन अर्थशास्त्र विभागातील डॉ. विनायक वनमोरे, डॉ. संतोष शेळके, प्रा. क्षितिज जाधव, डॉ. मधुरा जाधव, प्रा. कोमल काळे, डॉ.स्वाती माळकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कन्या महाविद्यालय, मिरजचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.विनायक वनमोरे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सागर पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी सहकारी प्राध्यापक,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा